Saturday, November 14, 2020

आरोग्यदायी आणि पर्यावरण पूरक दिवाळी

 


आरोग्यदायी आणि पर्यावरण पूरक दिवाळी

(Kindly Use Google Translator at the Extreme Right Top for Language Selection with Marathi  to English or the desired language.)

भारतात अनेक सण साजरे केले जातात, त्यापैकी दिवाळी हा एक प्रमुख सण आहे. दिवाळी हा भारतीय संस्कृती जपणारा धार्मिक दिव्याचा उत्सव आहे. जी दिवाळी जीवनाचा अंधार दूर करून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करते, जेथे दिवा मांगल्याचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच आपण दीप उत्सव साजरा करतो.

दिवाळीत वापरणाऱ्या खास मातीच्या पणत्या त्यातून निघणाऱ्या सुगंधातून किटाणू आणि विषाणू संपवून वातावरण शुद्ध होते, तसेच नकारात्मक ऊर्जा संपते. आजमितीला कोरोनाच्या होणाऱ्या प्रादुर्भावामुळे दिव्याच्या तेलामध्ये लवंग टाकली तर वातावरणातील शुद्धता वाढते. दिव्याच्या रोषणाईने बाहेरून येणारे प्रभावी किरणे रोखली जातात व आसमंतात दूषित परिणाम थांबवता येतात.

दिवाळी म्हणले, कि दिवाळी चा फराळ आणि नवनवीन मिष्टान्नाचा ओढा सगळीकडे असतो. आपण दिवाळीत एकमेकांना मिष्टान्नाची दिवाण-घेवाण करून आनंद द्विगुणित करत असतो. अशा पदार्थाच्या सेवनातून काही विकार व काही प्रमाणात अन्न विषबाधाही होऊ शकते. त्यामध्ये प्रामुख्याने वापरण्यात येणारे तेल, खवा, साखर यामधील भेसळ हेच प्रमुख कारण आहे. आता आपण जाणून घेऊ वेगवेगळ्या पदार्थातील भेसळ:

1.  चांगल्या प्रतीच्या अन्नधान्य आणि इतर मालाची गुणवत्ता कमी करणे म्हणजेच भेसळ. विक्री करावयाचा कोणताही उत्तम प्रतीचा माल (त्यात इतर पदार्थ मिसळून, किंवा त्यातील कार्यकारी घटक काढून) तो कनिष्ट प्रतीचा करून तो चांगल्या प्रतीचाच असल्याचे दर्शविणे, यास भेसळ करणे असे म्हणतात. अशी भेसळ करण्यामागे जास्तीचा अधिक नफा मिळविणे हाच प्रमुख हेतू असतो.

2.  दैनदिन जीवनात आहारातील विविध अन्न पदार्थांना गोडवा देण्यासाठी सर्वात उपयुक्त घटक म्हणजे साखर. बाजारात साखर, गुळ, मध असे विविध गोडवा आणणारे घटक उपलब्ध आहेत. परंतु या सर्वांमध्ये हि आपणाला भेसळ आढळते. साखर हि दररोज वापरण्याजोगी वस्तू मानली जातेपरंतु तरीही आपल्याला मानवी सुरक्षेसाठी त्याची गुणवत्ता आणि भेसळ याची खात्री करावी लागेल. साखर आणि इतर गोडवा देणारे घटक मुख्यत: कन्फेक्शनरी (Confectionary) क्षेत्रासाठी उपयुक्त आहेत.

अश्याप्रकारच्या भेसळयुक्त गोड पदार्थात रसायने टाकण्याची हि शक्यता असते. यामुळे शरीराला नानाविध अपायकारक विकार जसे कि, यकृताचे विकार, पोटदुखी, अन्नातून विषबाधा, उलट्याडोकेदुखीमळमळ उद्भवू शकतात. त्यामुळे आपणाला वेळीच भेसळ ओळखता आली पाहिजेजेणेकरून आपले शरीर स्वस्थ राहील. सामान्यपणे गोडवा आणणाऱ्या पदार्थात खडू पावडरधुण्याचा सोडापिवळा रंगयुरियापांढरी वाळूदगडमेटॅनिल अशा विविध घटकांची भेसळ केली जाते.  यासाठी विश्वसनीय दर्जाची आणि चांगल्या गुणवत्तेचीच गोडवा आणणारी घटके अन्न पदार्थात वापरली पाहिजे. 

3.  सर्व प्रकारची मिष्टान्ने बनवण्यासाठी तेलाचा वापर केला जातो. साधारणतः असे आढळून येते कि, सुटे विकल्या जाणाऱ्या तेलापेक्षा पॅकिंग करून विक्रीला आलेल्या तेलामध्ये भेसळीचे प्रमाण कमी असते.

4.  दूध आणि खव्यामध्ये सुद्धा भेसळ आढळून येते. यात असे नमूद करावे वाटते कि, दुधात फक्त पाण्याचीच भेसळ नसून युरिया, सोडियम, स्टार्च  यासारखे घटक रसायने वापरतात. खव्यामध्ये स्निग्धांश विरहित दूध वापरले जाते व तसेच स्टार्चचीही भेसळ केली जाते. 

5.  साधारणतः असे पाहिले जाते कि, अन्नधान्यामध्येहि भरपूर प्रमाणात भेसळ केली जाते. त्यात प्रामुख्याने बाह्य पदार्थ जसे कि खडे, माती, लोखंडाचा चुरा, निकृष्ठ धान्य आदी मिसळले जाते.

पर्यावरण पूरक दिवाळी:

आज आपणाला विचार करावयाची वेळ आली आहे कि, दिवाळी हि खरोखरच अंधार दूर करते कि वाढवते. याला कारण म्हणजे हा सण लहानांपासून ते मोठ्यापर्यंत साऱ्यांना आवडते कारण यात नवीन कपडे, फराळ आदि आणि अजून एक आकर्षण म्हणजे फटाके.

फटाके लहान मुलांना आकर्षित करतात, तेच फटाके कितीतरी जणांना इजा पोहचवतात. यामुळे मंगलपूरक वातावरणात द्रुष्ट लागू नये म्हणून वेळीच काळजी करायला हवी. मोठ्या आवाजातील फटाके बनवण्यास अनेक रसायनाचा उपयोग करतात त्यात सोडियम मेटल, पोटॅशिअम नायट्रेट, अलुमिनिम पावडर, झिंक मेटल यांचा वापर केला जातो. यापासून हवा, पाणी, माती प्रदूषणाची हि समस्या उद्भवते. सांगायचे झाले तर, दिवाळी दरम्यान हवेच्या प्रदूषणामध्ये १०% वाढ होते, यामुळे श्वसनाचे विकार, घशाची खरखर, दमा, खोकला यांचा प्रादुर्भाव वाढतो.

फटाक्यांच्या आवाजाने ध्वनी प्रदूषण हि होते. फटाक्याने वाढणारी आवाजाची पातळी १२५ dB पेक्षा जास्त असते. प्रामुख्याने ८० ते १३० dB च्या आवाजाने तात्पुरता बहिरेपणा येतो, तसेच १५० dB पेक्षा जास्त आवाजाने कानाचा पडदा  फाटणे,कर्ण बधिरता, रक्त दाब वाढणे, मानसिक ताण आदींचा प्रादुर्भाव वाढतो.

आरोग्य हीच संपदा: धार्मिक कार्यातून आरोग्य समृध्द होण्याची प्रार्थना आपण करत असतो. पण या आधुनिक विश्वात समतोल आहार, राहणीमान, आचार विचार, आवडी-निवडी यांची सांगड घालणे अतिशय आवश्यक आहे.

आपणाला पर्यावरण पूरक आणि आरोग्यदायी दिवाळी साजरी करावयाची आहे. जेणेकरून, दिवाळी साठी महिन्याभरापासून जी, साफसफाई करतोय, तो स्वछ सुंदर परिसर राखण्याचा तसेच मांगल्याचे वातावरणात नवीन उत्साहाने प्रफुल्लित होऊन आपली दिवाळी साजरी होईल. ज्यात कोणतीही आरोग्य तसेच पर्यावरण हानी होणार नाही, जी अंधःकारामध्ये प्रकाशमान विजयी असा पाच दिवसांचा असा हा दिवाळी सण ज्यात सकारात्मकता वाढो. सर्वाना आरोग्यदायी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्या.

 


No comments: